१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस


१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस

१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला.

हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का ?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेबानी उत्तर दिले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे असा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली. शासनाच्या या समितीने काही नावे विचारात घेतली होती या नावांमध्ये मराठवाडा, पैठण, प्रतिष्ठान, औरंगाबाद, अजिंठा, दौलताबाद, सातवाहन, देवगिरी, शालिवाहन, अश्या सर्व स्थळांची नावे होती. तसेच मान्यवर व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ स्मारक झाले नाही. म्हणून २७ जुलै १९७८ रोजी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला.

महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु काही जातीयवादी मंडळीकडून विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच घाबरली नाही. त्यांनी नामांतराची लढाई यापुढेही चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती.

संपूर्ण महाराष्ट्रात एकच घोषणा घुमत होती. “नामांतर झालेच पाहिज”’. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने शासन नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे” बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांलाही जातीयवादी सैतानांनी हाल हाल करून ठार मारले. जनार्धन मवाडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, रोशन बोरकर, दिलीप रामटेके असे कितीतरी कार्यकर्ते नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सर्व दलित जनतेचा नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित केला व “जिंकू किंवा मरू “, अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबण्यात आले.

त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर…चारही बाजूने सरकारची कोंडी करण्यात येत होती. शासनासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला.

नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘प्रवेशद्वाराची’ ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नामांतर (नामविस्तार) दिनाच्या सर्व आंबेडकरी जनतेस हार्दिक शुभेच्छा तसेच नमांतर लढ्यातील शहिदांना कोटी कोटी विनम्र अभिवादन


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!