वैशाखी पौर्णिमा, तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८८ वी जयंती
तथागत भगवान गौतम बुद्ध
सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ स पू ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी पुरुष. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली (झाडाखाली) ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) म्हणून संबोधू लागले.
‘बुद्ध’ हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त, स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. जगाच्या इतिहासातील महामानवां मध्ये तथागत गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
मानवी दुःखाचा उगम आणि त्या दुःखाची कारणे आणि दुःख निवारण्याचे मार्ग जगाला सगळ्यात प्रथम सांगणारे, शांतिदूत आणि सत्यशोधक, भारत भूमीच्या कणाकणात आजही वास करून असलेले, जगात ज्यांच्या नावामुळे आजही भारताची ओळख आहे असे ते तथागत भगवान गौतम बुद्ध होय.
तथागतांनी समाजात परस्पर सहकार्य, प्रेम आणि परोपकाराचा संदेश दिला आहे. दान आणि स्वार्थ याबद्दल भगवान बुद्ध म्हणतात, दान हे जसे माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवते, तसेच स्वार्थ हा एक विनाशकारी आजार आहे, जो शेवटी दुःखच निर्माण करतो.
दान हे या जगातील सर्वात मोठे धन आहे, कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा केवळ त्यांनाच समाधान मिळत नाही, तर आपल्यालाही मानसिक समाधान, आनंद आणि आत्मिक समृद्धी मिळते. ज्ञान, वेळ, प्रेम, आणि सहानुभूती तसेच आर्थिक मदत करणे यांचेही दान अतिशय महत्त्वाचे आहे.
स्वार्थ हा एक मोठा आणि घातक रोग आहे, कारण स्वार्थी वृत्तीमुळे माणसं लोभी, अहंकारी आणि इतरांविषयी असंवेदनशील होतात. अशा वृत्तीमुळे समाजात भेदभाव, संघर्ष आणि दुःख वाढते. स्वार्थ माणसाच्या मनातील शांती हिराऊन घेतो व तो आणि त्याला सतत असंतोषात ठेवतो.
ज्या धर्मातून असमानता, विषमता, शोषण या सगळ्यांतून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा , माणसांचा द्वेष केला नाही तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं.
आपल्याला आपल डोकं वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचे वाटतात. आणि त्यांना समजून घ्यायला त्यांच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही ना तिचं दडपण येतं.
बुद्ध कायमच अस हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत सगळीकडं भेटतात.
मेंढर बनू नका, माना डोलावणारे नंदीबैल बनू नका तर विचार करणारी माणसं बना हे बुद्ध आपल्या कृतीतून सांगतात.
कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतात, तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतात, तुम्हाला तुमच्या जवळ असलेलं डोकं वापरायला सांगतात.
तथागत भगवान बुद्ध जन्मदिनाच्या अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा व मंगलमय कामना. !!!